जगाला शांततेचा, अहिंसेचा, समतेचा संदेश देणा-या तथागत गौतम बुद्धांची वैशाख बुद्ध पौर्णिमा जगभरात साजरी केली जाते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे, ती म्हणजे याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते. बुद्ध पौर्णिमा ही केवळ भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांत साजरी केली जातो. यात श्रीलंका, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, नेपाळ, थायलंड, मलेशिया, म्यानमार, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या देशांचाही समावेश आहे. श्रीलंकेत बुद्ध पौर्णिमेला ‘वेसाक’ असे म्हणतात. हा वैशाखचा अपभ्रंश आहे.
बुद्ध पौर्णिमेला स्रू्य मेष राशीत, तर चंद्र तूळ राशीत प्रवेश करतो. या दिवशी गंगेत केलेले स्नान पवित्र मानले जाते. गंगेत स्नान केल्याने गेल्या जन्मातील कुकर्मातून मुक्ती मिळते, असा समज आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध भिक्षुक ठिकठिकाणचे बुद्ध विहार आणि मठांमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात. बुद्ध मूर्तीसमोर दीप लावतात. प्राथनास्थळे रंगीबेरंगी पताक्यांनी सजवली जातात. बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी केला जातो.
आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म सिद्धांतावरून तथागत बुद्धांना जगातील महान महापुरुष व गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठय़ा प्रमाणावर संख्या असणा-या चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. जगभरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी होत आहे. याच पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनात पाच अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या.
१. राजपुत्र सिद्धार्थ गौतमचा जन्म
२. राजकन्या यशोधरेचा जन्म
३. राजकुमार सिद्धार्थचा मंगलपरिणय (विवाह)
४. ज्ञानप्राप्ती
५. महापरिनिर्वाण
भगवान गौतम बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होतो. या तिथीला बुद्ध पौर्णिमा म्हटले जाते. गौतम बुद्ध ज्या-ज्या ठिकाणी गेले, ती सर्व ठिकाणे बौद्ध तीर्थ बनले. बुद्धांनी काश्मीरपासून ते अफगाणिस्तानपर्यंत यात्रा केली होती. बौद्धकाळात अफगाणिस्तान बामियान क्षेत्र बौद्ध धर्माची राजधानी होती. मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल प्रारंभिक काळात बौद्ध धर्माचे गड होते. बुद्ध पौर्णिमे निमित्ताने आम्ही तुम्हाला बुद्धाच्या काही ठिकाणांची माहिती देत आहोत.
लुंबिनी
गौतम बुद्धांचा जन्म इ.स. ५६३ पूर्वी नेपाळच्या लुम्बिनी वनामध्ये वैशाख पौर्णिमेला झाला. उत्तर प्रदेशातील ककराहा नामक गावापासून १४ किलोमीटरवर नेपाळ-भारताच्या सीमेवर असलेल्या रुमीनोदेई नावाचे गाव लुम्बिनी असून, हे गौतम बुद्धांच्या जन्मस्थान रूपात प्रसिद्ध आहे. कपिलवस्तूमध्ये एक स्तूप होते, जेथे भगवान बुद्धांच्या अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. बुद्धांची आई कपिलवस्तूची महाराणी मायादेवी आपल्या माहेरी कोलीय गणराज्याची राजधानी देवदह येथे निघाल्या होत्या, तेव्हा रस्त्यामध्ये त्यांनी लुम्बिनी वनामध्ये एका शाल वृक्षाखाली बुद्धांना जन्म दिला होता.
बोधगया
हे स्थान बिहारचे प्रमुख हिंदू पितृ तीर्थ ‘गया’ येथे स्थित आहे. गया शहराचे नाव गयासूर नावावरून ठेवण्यात आले होते. याच ठिकाणी एका झाडाखाली गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्त केले होते.
सारनाथ
हे ठिकाण उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळ आहे. येथे बुद्धांनी ज्ञान प्राप्त केल्यानंतर पहिला उपदेश दिला होता. येथूनच त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन प्रारंभ केले होते.
कुशीनगर
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात स्थित या ठिकाणी महात्मा गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले होते. गोरखपूर जिल्ह्यातील कासिया नामक ठिकाणी प्राचीन कुशीनगर आहे.
श्रावस्तीचे स्तूप
पूर्वोत्तर रेल्वेच्या गोरखपूर-गोंडा मार्गावर असलेल्या बलरामपूर स्टेशनपासून १२ किलोमीटरवर पश्चिमेला सहेठ-महेठ नावाची प्राचीन श्रावस्ती आहे. ही कौशल देशाची राजधानी होती. भगवान श्रीरामाचा मुलगा लवने श्रावस्तीला आपली राजधानी बनवली होती. श्रावस्ती बौद्ध आणि जैन दोन्हीचे तीर्थ आहे.
आपल्या प्रत्येकामध्ये सिद्धार्थच्या रूपाने छोटा बुद्ध आहे. बुद्ध हे बुद्ध होण्याआधी सिद्धार्थ होते. ते भटकत होते, हरवले देखील. ते म्हणायचे, ‘जग हे दु:खाने भरलेले आहे आणि मला दु:खापासून मुक्त व्हायचे आहे.’ सर्वकाही दु:ख आहे, हे त्यांनी जाणले होते; परंतु त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता. बुद्धांनी अतोनात प्रयत्न केले, जमीन आसमान एक केले, सारे दरवाजे ठोठावले. विविध प्रक्रिया मागून प्रक्रिया करून पाहिल्या. सारे निर्थक झाले. कारण, हे सर्व करत असताना त्यांचे मन सतत बाहेर धावायचे. मग ते दमले भागले-सारे सोडून दिले आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले.
विविध प्रयत्न करून जेव्हा ते थकले आणि मग त्यांनी विचार केला की, ठीक आहे, आता मी सर्व काही सोडून देत आहे. मला जरा विश्राम करू द्या, त्यांनी सर्व काही सोडून दिले आणि त्यांचे मन अंतर्मुख झाले आणि ते ‘बुद्ध’ बनले.
दुर्दैवाने बुद्धांना त्याकाळी गुरू लाभले नाहीत. त्यांना बसताक्षणी समाधी प्राप्त व्हायची. पण, बुद्धांना ध्यान आणि समाधी प्राप्त करणे सहज शक्य नव्हते. त्यांच्यासाठी ते कठीण होते. त्यांना कोणी सांगितले उपवास करा, त्यांनी उपवास केला. ते राजघराण्यातील असल्यामुळे ते समर्पण, भक्ती आणि त्यागाबद्धल काहीही जाणत नव्हते. काहीतरी करावे लागते, काहीतरी केले पाहिजे, एवढेच त्यांना ऐकून माहीत होते आणि जे ऐकले ते करत गेले. जेवढे करणे तेवढा कर्ताभाव, तेवढा अहंकार. या सर्वामुळे बराच कालावधी ते धावतच राहिले. शेवटी त्यांनी सर्व सोडून दिले आणि त्यांना ज्ञान प्राप्त झाले.






